computer

विनोद खन्नाने नक्की काय केल्याने बच्चनचा सुपरस्टार पदाचा मार्ग सुकर झाला ?

दृश्य एक :

वर्ष १९७४

चित्रपट : हाथ की सफाई

रस्त्याने चाललेल्या सुटाबुटातील एका 'सभ्य' माणसाचे पाकीट पळवण्यासाठी पाकीटमार रणधीर कपूर त्याच्या खिशात हात घालतो. पण, त्या हातावर त्या व्यक्तीची मजबूत पकड पडते आणि "तुम जिस स्कूलमें पढ रहे हो, उस स्कूल के हम हेडमास्टर रह चुके...'' हा त्याचा संवाद कानावर पडताच थिएटर शिट्टयाटाळ्यांनी दणाणून जाते...

 

दृश्य दोन: ३३ वर्षानंतरचे

साल २००७

चित्रपट : रिस्क

इन्स्पेक्टर सूर्यकांत साटम झालेला रणदीप हुडा उसळून बोलत असतो. अंडरवर्ल्ड डॉन खालीदला फरफटत आणण्याची भाषा करत असतो. एकीकडे इन्स्पेक्टरचा संतापाने तीळपापड झालेला असतो. त्याला काडीची किंमत न देता आपल्याच मस्तीत जगणारा खालीद शांतपणे त्याच्याशी असतो. "टाईम का गेम बहोत बडा होता है. उससे कभी खिलवाड नही करने का... अब फोन रक्ख... 'पान चघळत मोबाईलवरून अंडरवर्ल्ड डॉन इन्स्पेक्टर साटमला जवळपास हुकूमच करतो. त्याचे ते थंड आवाजातील सहज सांगणेही अंगावर काटा उभा करणारे असते.

या दोन्ही दृश्यांतील "तो" म्हणजे रूपेरी पडद्यावर गारूड निर्माण केलेला दिमाखदार अभिनेता विनोद खन्ना....गुरुवारी त्यानं मुंबईत अखेरचा श्वास घेतला....चंदेरी दुनिया आणि चाहते एका दिमाखदार अभिनेत्याला मुकले.

स्रोत

 कधीकाळी बिग बी आमिताभ सुपरस्टारपदासाठी झगडत असताना रुपेरी पडद्यावर त्याला थेट आव्हान निर्माण केलेला तो एकमेव अभिनेता ठरला. मर्दानगी आणि मार्दवतेचा सहजसुंदर संगम असलेला बॉलीवूडमधील राजहंस अर्थात विनोद खन्नाने आज रुपेरी सृष्टीला अलविदा केला. विनोदने मोजकेच पण निराळे चित्रपट दिले. पिटातल्या प्रेक्षकांना आवडणा-या मारधाडीपासून ते कलात्मक अंगाने जाणा-या चित्रपटांमध्ये त्याने जान ओतून काम केलं. तो केवळ अभिनेताच राहीला नाही ; तर तो एक यशस्वी उद्योजक आणि यशस्वी राजकारणीही बनला. अध्यात्मिक मार्गातही तो उच्च पदावर पोचला होता... तो ओशोंचा पट्टशिष्य होता. देश-विदेशातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांशी त्याचे गहिरे संबंध होते. आमिताभला काट्याची टक्कर दिलेल्या विनोद खन्नाने रुपेरी दुनियेत स्वतंत्र स्थान निर्माण केले होते.

 विनोद खन्ना म्हटले की आठवतात त्याचे कच्चेधागे, हत्यारा, इन्कार, सौदा, बॉम्बे 405 माईल्स, सरकारी मेहमान, द बर्निंग ट्रेन, लहू के दो रंग असे कितीतरी मसालापट. 'मेरा गाव मेरा देश'मधील क्रूरकर्मा डाकू जब्बारसिंग आजही अनेकांच्या स्मरणात आहे. 'दयावान' मधील त्याने साकारलेली शक्तीवेलू या गॉडफादरची भूमिका त्याच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. मन का मीत, मेरे अपने, परिचय, शक, अचानक, इम्तेहान, सौदा, लेकीन, रिहाई, लिला अशा निराळ्या विषयांवरील अनेक कलात्मक चित्रपटांतून त्याने अमीट ठसा उमटवला.

स्रोत

साडेसहा फूट उंच, गोरापान वर्ण, राजबिंडा चेहरा आणि दणकट शरीरयष्टी लाभलेल्या विनोदच्या व्यक्तिमत्वातील मर्दानगीचे आणि मार्दवतेचे अनोखे मिश्रण त्याच्या अभिनयातही उतरायचे. त्यामुळेच 'मेरे अपने' मधील छेन्नोला म्हणजेच शत्रुघ्न सिन्हाला नजरेने आव्हान देणारा हा श्याम एकाकीपणाच्या भावनेतून आठवणीने व्याकूळ होत 'कोई होता जिसको अपना' हे गाणे गुणगुणतो तेव्हा पापण्यांच्या कडा ओलावतात. 'कुर्बानी' मध्ये खलनायकाकडून खच्चून मार खाताना चेहऱ्यावरील सुरकुतीही हलू न देणारा अमर अणि शाळेजवळ वाट पाहत बसलेल्या आपल्या लहानगीला ममतेने कवेत घेतानाचा अमर पाहताना प्रेक्षक हरवून गेले. 'कुर्बानी'मधील हा सीन हिंदी चित्रपटांतील सर्वोत्तम प्रसंगांमधील एक गणला जातो. विनोदची खरी देहबोली या प्रसंगातून दिसते. पोलीस अधिका-याच्या मुलीवर अत्याचार करणा-यांना कठोरपणे धडा शिकवणारा,'चिंता काय की अण्णा'? म्हणत कोणतीही समस्या सोडवणारा, आपला मुलगा सूर्या याची गुन्हेगारी क्षेत्रात येण्याची इच्छा लक्षात आल्यावर उद्विग्न होणारा, त्याच्या मृत्युने कोलमडून पडणारा आणि पोटच्या मुलीने निर्भत्सना केल्यावर मनातून कोसळलेला 'शक्तीवेलू' त्याने 'दयावान' मधून अक्षरश: जिवंत केला. खलनायकी भूमिका करून पुढे नायक म्हणून प्रस्थापित झालेला विनोद हा एकमेव अभिनेता ठरला.(थोडा अपवाद शत्रुघ्न सिन्हाचा). त्याचबरोबर, चित्रपटसृष्टीत अत्युच्च स्थानावर असताना संन्यास घेऊन तब्बल बारा वर्षांनंतर पुनरागमन केल्यावरही प्रेक्षकांनी पूर्वीच्याच प्रेमाने स्वागत केलेला ही तो एकमेव अभिनेता ठरला.

स्रोत

हिंदी चित्रपटसृष्टीसाठी सत्तरचे दशक महत्वाचे ठरले. त्या काळात सुपरस्टार राजेश खन्नाचा झंझावात सुरू होता. 1973 मध्ये 'जंजीर'ने तिकीटबारीवर तुफान गल्ला गोळा केला. त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांना सर्वसामान्य भारतीय नायकाचा चेहरा आमिताभच्या रुपाने मिळाला. त्याच्या जबरदस्त अदाकारीने राजेश खन्नाचे सिंहासन डळमळू लागले होते. अँग्री यंग मॅन आमिताभने सुपरस्टारपदावर दावा सांगितला. पण, हे पद मिळवणं तितकं सोपंही नव्हतं. त्याकाळात धर्मेंद्र, जितेंद्र, शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा आदींनी आपापला मोठा प्रेक्षक वर्ग तयार केला होता. त्यांच्यासमवेत चित्रपट करतानाच आमिताभची त्यांच्याशी स्पर्धा झाली. पण, आमिताभच्या झंझावातापुढे निभाव न लागल्याने एक-एक करत ही मंडळी स्पर्धेतून बाजूला झाली.

स्रोत

या वादळामध्ये खंबीरपणे टिकून राहीला तो फक्त आणि फक्त विनोद खन्ना. देखणे, उमदे व्यक्तिमत्व आणि तरल अभिनयाच्या बळावर विनोदने स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्याचा आमिताभशी जबरदस्त सामना सुरू झाला. अमर अकबर अँथनी, खून पसिना, हेराफेरी, जमीर, परवरीश, मुकद्दर का सिकंदर असे एकामागोमाग एक सरस चित्रपट देऊन या दोघांनी ऐंशीचे दशक गाजवले. पण,सुपरस्टारकोण ? याचा फैसला होत नव्हता. दोघेही तोडीस तोड होते. दोघांची अभिनय क्षमता वादातीत होती. व्यक्तिमत्वे भिन्न असली, तरी दोघांचे खास प्रेक्षकवर्ग तयार झाले होते. चित्रपटातील त्यांचा सामना रसिकांसाठी पर्वणी ठरली होती. राजेश खन्नानंतर सुपरस्टारचा बहुमान आमिताभला मिळणार की विनोद खन्नाला ? याबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिकेने चर्चा चालली होती. पण,या चर्चांना एक आकस्मिक कलाटणी मिळाली. वैयक्तिक जीवनात सैरभैर झालेल्या विनोदने अचानक चित्रपट संन्यास घेतला. भगवान ओशोंची दीक्षा त्याने घेतली. सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून तो पुण्यात रजनीश आश्रमात संन्यासी बनला. 1979 मध्ये 'मुकद्दर का सिकंदर' झळकला. तो पर्यंतच्या सामन्यात आमिताभ आणि विनोद खन्ना समान ताकदीचे खिलाडी होते. सुपरस्टार कोण?याचा कौल या चित्रपटातून मिळणे अपेक्षित होते. कारण, 'कुर्बानी' ने जवळपास विनोदच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. पण, हा अंतीम सामना एकतर्फी झाला. विनोद खन्ना स्पर्धेतून दूर झाल्यामुळे सुपरस्टारपदाची माळ आपसुक अमिताभच्या गळ्यात पडली. नव्या पिढीतील अनेकांना हा इतिहास माहित नाही. कदाचित त्यामुळेच शाहिद, रणबीरमध्ये आपल्या स्वप्नातील हिरो शोधणा-या या तरुणाईला बॉलीवूडमधील खरा दिमाखदार हिरो असलेला विनोद खन्ना कोण ? हे समजावून सांगावे लागते.

स्रोत

80 च्या दशकात विनोदला व्यक्तिगत आयुष्यात बरेच धक्के सहन करावे लागले. परिवारातील व्यक्तींच्या एकापाठोपाठ झालेल्या मृत्युंनी तो व्यथित झाला. त्यातच लाडकी पत्नी गीतांजलीशी त्याची काडीमोड झाली. त्यामुळे तो मनातून कोसळला. अखेर, मानसिक शांततेच्या शोधात तो पुण्याच्या रजनीश आश्रमामध्ये स्वामी विनोद भारती बनून तब्बल बारा वर्षे राहीला. योगसाधनेने विनोदचे व्यक्तिमत्व अंतर्बाह्य बदलून गेले. सुख, दु:ख, आनंद, उद्वेग, अपेक्षाभंग, उदासिनता, आकर्षण, प्रेम अशा सर्व भावभावनांच्या तो पलिकडे गेला. सर्व भावनांपासून तो अलिप्त बनला होता. बारा वर्षांनंतर चित्रपटसृष्टीत तो परतला तेव्हा तो पुन्हा पूर्ववत अभिनय करू शकेल का ? याची अनेकांना काळजी वाटत होती. या बारा वर्षांच्या काळात फक्त एकदाच ते ही गायक महंमद रफी यांच्या अंत्ययात्रेमध्ये विनोदचे दर्शन झाले होते. हिप्पीसारखे केस वाढवून, मरून झगा आणि गळ्यात ओशोंचे भलेमोठे लॉकेट असा त्याचा संन्याशाचा अवतार पाहून तो चित्रपटसृष्टीत परतण्याची सूतराम शक्यता कोणाला वाटत नव्हती. पण इन्साफ, सत्यमेव जयते, दयावान, या चित्रपटांनी विनोदच्या यशाचा वारू पुन्हा एकदा चौखूर उधळला. पूर्वी आमिताभबरोबरच  मनोजकुमार, शशी कपूर, सुनील दत्त, जितेंद्र, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, ऋषी कपूर अशा आघाडीच्या बहुतेक अभिनेत्यांसोबत काम केलेल्या विनोदची सुलक्षणा पंडित, हेमामालीनी, रेखा यांच्यापासून ते अलिकडच्या श्रीदेवी, माधुरी दिक्षित, जूही चावला, अमृता सिंग यांच्यासमवेत पडद्यावर जोडी खुलली.

स्रोत

आयुष्याच्या दुस-या टप्प्यात विनोद खन्ना अभिनयाबरोबरच निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत झाला. जुन्या मित्रांच्या मदतीने तो प्रकाशन व्यवसायामध्ये उतरला. काही उद्योगपतींशी भागीदारी केली. त्याने राजकारणातही प्रवेश केला. पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाकडून विनोद खन्ना सलग तीनवेळा विजयी झाला. पहिल्या वेळेस तर संपूर्ण पंजाबमधून विजयी झालेला भाजपाचा तो एकमेव उमेदवार होता. विनोदचे कार्यक्षेत्र आणि संबंध लक्षात घेऊन त्याच्यावर पराराष्ट्र,सांस्कृतिक आणि पर्यटन या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली. रुपेरी पडद्यावरीलही त्याची इनिंग पुन्हा भरात आली होती. नव्या पिढीच्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्यास त्याला कधीच कमीपणा वाटला नाही. सलमान खान, अभिषेक बच्चन, बॉबी देओल,इशा देओल या आपल्या सहका-यांच्या नव्या पिढीसमवेतही त्याने काम केले. 'रिस्क'मध्ये त्याने साकारलेली गँगस्टर खालीद भाईची भूमिका चाहत्यांना आनंद देऊन गेली. विनोद खन्नाने वास्तव आयुष्यात एकाच वेळी अभिनेता, उद्योजक आणि राजकीय नेता अशा विविधरंगी भूमिका ताकदीने पेलल्या.

स्रोत

 कित्येकदा काही कलाकारांच्या सर्दी-खोकला झाल्यापासून ते त्यांच्या नव्या-जुन्या अफेअर्सबाबत प्रसारमाध्यमांमधून भरपूर प्रसिद्धी दिली जाते. पण, कोणीही गॉडफादर पाठीशी नसताना, सव्वाशेहून अधिक चित्रपट केलेल्या विनोद खन्नासारख्या दिमाखदार अभिनेत्याच्या, बॉलीवूडमधील या राजहंसाची प्रसारमाध्यमांनी हवी तितकी नोंद घेतली नाही.. नाही म्हणायला गेल्या महिन्यात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्याच्या रुग्णालयातील फोटोमुळे त्यांच्याबाबत थोडीफार चर्चा झाली हे ही नसावे थोडके...वैयक्तिक आयुष्यात बरेच धक्के सोसलेल्या आणि त्यानंतर योगसाधना केलेल्या विनोदने जगण्यासाठी स्वत:ची तत्वे तयार केली होती. कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता तो त्या तत्वाने चालत राहिला.. त्याच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच असलेली त्याची रुपेरी सृष्टीतील, राजकारणातील दिमाखदार वाटचाल गेल्या वर्षी २७ एप्रिलला कायमची थांबली. 'रूक जाना नही,  तू कभी हारके..... अशी त्याची साद कायमची निमाली आहे.

 

लेखक - आबिद शेख, पुणे
(8806706466)

सबस्क्राईब करा

* indicates required