computer

गांधी चाळीतल्या लोकांचा '१५ ऑगस्ट'...नेटफ्लिक्सच्या दुसऱ्या मराठी सिनेमाचा ट्रेलर पाह्यला का !!

गेल्यावर्षीच नेटफ्लिक्सने त्यांच्या आगामी मराठी चित्रपटांची घोषणा केली होती. पहिला सिनेमा ‘फायरब्रँड’ २२ फेब्रुवारीला रिलीज झाला. दुसरा सिनेमा “१५ ऑगस्ट” २९ मार्च रोजी रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

१५ ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन. नावातच १५ ऑगस्ट असल्याने चित्रपट कशावर असणार याचा अंदाज आपल्याला आधीच येतो. एक प्रश्नही पडतो. १५ ऑगस्टवर हे लोक काय वेगळं दाखवतील ब्वा ? ट्रेलर बघून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल.

गांधी चाळीत राहणाऱ्या माणसांची ही गोष्ट आहे. १५ ऑगस्टच्या निमित्ताने चाळीतले सगळे एकत्र जमतात. त्यानिमित्ताने काही नाट्यमय घटना घडत जातात. या कथेच्या बरोबरीने आणखी एक कथा घडत जाते. आपल्याला एक प्रेमप्रकरण दिसतं. या प्रेमप्रकरणात अडकलेल्या पात्रांच्या स्वतःच्या वेगळ्या समस्या आहेत. अशा दोन टाईमलाईनवर चाललेली ही कथा एका घटनेने एकत्र बांधली जाते. ती घटना कोणती हे तुम्ही ट्रेलर मध्येच पाहा. शेवटी गांधी चाळीतले लोक कसे एकत्रितपणे आपल्या समस्यांना सामोरे जातात आणि त्यातून मार्ग काढतात याची कथा म्हणजे हा सिनेमा.

राहुल पेठे, मृण्मयी देशपांडे, वैभव मांगले, आदिनाथ कोठारे अशा मराठी कलाकारांची फळी या चित्रपटात आहे. स्वप्ननील जयकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. माधुरी दीक्षित यांची ही पहिलीच निर्मिती असणार आहे.

नेटफ्लिक्सचा पहिला मराठी सिनेमा ‘फायरब्रँड’ काही जमून आला नव्हता. ही कमी १५ ऑगस्ट भरून काढेल असं दिसतंय. ट्रेलर प्रॉमिसिंग वाटत आहे. तुम्हाला कसा वाटला ? तुमचा रिव्ह्यू नक्की द्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required