जळू लावणे - एकेकाळी गावठी समजला जाणाऱ्या उपचाराला मिळाली आंतरराष्ट्रीय मान्यता!!

मंडळी, पूर्वीच्या काळी रोगांवर इलाज करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नसायचे. काही बाह्य शारीरिक इलाज हे गावातील नाभीकांमार्फत केले जात असत. एका अर्थाने नाभिक समाज हाच पूर्वी डॉक्टरी व्यवसायातच होता असे म्हटले तरी चालेल. तुम्हाला माहीत आहे का ‘रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी’ ही म्हण कुठून आली? पूर्वी कुणाचे रक्त गोठले किंवा मोठी गळवे झाली तर अशुद्ध रक्ताचा निचरा करण्यासाठी न्हावी त्या ठिकाणी जळू लावत असत. जळू या सरपटणाऱ्या कृमी वर्गातील प्राणी आहेत. जळू अशुद्ध रक्त शोषून घेत. याच उपचाराला तुंबड्या लावणे असे म्हणतात. जळूचे इंग्लिश नाव आहे "लीच". म्हणजेच आजारांवर उपचार करण्यासाठी जळूचा वापर करणे हे काही नवीन नाही. हजारो वर्षांपासून या पद्धतीचा वापर होतो. मध्यंतरीच्या काही वर्षात ही पद्धत अनारोग्यकारक आहे म्हणून ती बाजूला पडली. आधुनिक वैद्यकीय शास्त्राला सुद्धा याचे गुणधर्म समजल्याने आता अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने हेच उपचार ‘लीच थेरपी’ या नावाने केले जात आहेत.

मुख्यतः सर्जन जसे की, प्लास्टिक सर्जन, मायक्रोसर्जरी, ऑर्थोपेडिक डॉक्टर तसेच जखमेवर उपचार करणारे डॉक्टर याचा वापर करतात. 

काय आहे ही उपचार पद्धती?

स्रोत

जळू रक्त शोषून घेणाऱ्या कृमी आहेत. त्यांच्या 3 जबड्यात प्रत्येकी शंभर दात असतात. जळवांच्या लाळेत ६० वेगवेगळ्या प्रकारची प्रथिने असतात. रक्त न गोठता ते अधिक पातळ होऊन शोषण सहज व्हावे म्हणून हिरुडीन, अप्रायस, कोलेजनेस, व्ह्यॅसोडायलेटर्स, प्रोटीनेस यासारखी अनेक रसायनांचा यात समावेश असतो. शिरांमधील रक्त गोठले असेल तर तिथे लीच थेरपी केल्यास रक्तप्रवाह परत सुरळीत होऊ शकतो. टिश्यू अटॅचमेंट मध्ये सुद्धा जळूच्या चाव्याचा उपयोग होतो. 

हे उपचार नेमके कसे केले जातात? 

स्रोत

शरीरात ज्या ठिकाणी रक्त साचले आहे, गोठले आहे किंवा एखादी जखम होऊन त्या ठिकाणचे रक्त दूषित झाले आहे अश्या जागेला आधी स्वच्छ केले जाते. त्यानंतर तिथे जळू रक्त शोषण्यासाठी लावल्या जातात. जळूच्या लाळेमध्ये बधिरता आणणारे रसायन असल्याने तिच्या चाव्याच्या वेदना जाणवत नाहीत. साधारणतः 45 मिनिटाने किंवा जळूचे पूर्ण पोट भरल्यावर तिला बाजूला केले जाते. एकदा पोट भरले की जळू शरीरापासून सहज बाजूला होते. गरज असेल तर आठ तासानंतर दुसरी जळू त्याच ठिकाणी लावली जाते.

एक जळू एका वेळी जवळपास 1.5 औंस इतके रक्त शोषून घेऊ शकते. ही लीच थेरपी तीन ते सात दिवसापर्यंत चालते. एका दिवसात दोन किंवा तीन वेळा जळूचा वापर केला जातो. 

स्रोत

मंडळी, ही अनोखी उपचार पद्धत आपल्याला समजली. पण याबाबत काही गैरसमज सुद्धा लोकांमध्ये आहेत. ते खरे की खोटे हे सुद्धा तपासून बघायला हवं. काही लोकांच्या म्हणण्यानुसार एकदा जळू शरीराला चिकटली की शरीरातले पूर्ण रक्त शोषल्याशिवाय ती निघत नाही. काही लोक म्हणतात की जळू मुळे संसर्गजन्य आजार होतात. पण हे समज चुकीचे आहेत मंडळी. 

FDA या संस्थेने ‘एकवेळ वापरण्याचे वैद्यकीय साधन’ (One Time Aplication) म्हणून जळूला मान्यता दिली आहे. त्यांना वापरण्याआधी सुरक्षित आणि निर्जंतुक वातावरणात ठेवलेले असते. वापर झाल्यानंतर ताबडतोब त्यांना नष्ट केले जाते. या वैद्यकीय उपचारात वापरल्या जाणाऱ्या जळू निसर्गात आढळणाऱ्या अन्य जळू प्रमाणे नसतात. त्यांना वैद्यकीय प्रयोगशाळेत मानवी वापरासाठी सुरक्षित अश्या वातावरणात बनवलं जातं. बॅक्टरीयाच्या संपर्कात त्यांना अजिबात येऊ दिलं जात नाही जेणेकरून संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ नये. 

शास्त्रीय पद्धतीने जळवांचे उत्पादन Biopharm Leech Ltd. या कंपनीद्वारे केले जाते. केवळ मानवी उपचारासाठी नव्हे तर गाय, म्हैस, बैल, घोडा अशा उपयुक्त प्राण्यांच्या उपचारासाठी देखील जळवा पुरवण्याचे काम ही कंपनी करते. भारतात अशा पद्धतीने जळवा उत्पादन करणे अजून कोणतीही कंपनी करत नाही. 

 

आपल्याला या उपचार पद्धतीविषयी काय वाटलं? आम्हाला जरूर कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required