computer

कोण आहेत हे विजय कर्णिक ज्यांच्यावर सिनेमा बनलाय...वाचा या अज्ञात हिरोची शौर्यगाथा !!

. ‘Bhuj - The Pride of India’ या सिनेमात अजय देवगण यांनी विजय कर्णिक यांची भूमिका साकारणार आहे. पण बऱ्याचजणांनी हे नाव माहितीच नाहीए. या पूर्वी कधीच विजय कर्णिक चर्चेत नव्हते. आज आम्ही या नावा मागचा इतिहास सांगणार आहोत. हा इतिहास वाचून तुम्ही हे नाव कधीच विसरणार नाहीत हे नक्की.

चला तर या अज्ञात हिरोविषयी जाणून घेऊया.

१९७१ च्या भारत पाक युद्धात नागपूरचे विजय कर्णिक हे हवाई दलाचे अधिकारी होते. त्यांच्याकडे गुजरातच्या भूज लष्करी हवाई तळाची जबाबदारी होती. ७१ च्या युद्धात हे एक महत्वाचं हवाई तळ होतं. पाकिस्ताननी लष्कराने हीच बाब लक्षात घेऊन काही दिवसातच संपूर्ण तळ उध्वस्त केलं. त्याच दरम्यान भारतीय सैनिकांनी भरलेलं एक विमान भूज येथे उतरणार होतं. धावपट्टीच शिल्लक नसल्याने विमान उतरणार कसं हा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

विजय कर्णिक यांनी यावेळी हवाई तळ पुन्हा बांधायचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांच्या सोबत वायुदलाचे ५० अधिकारी आणि सुरक्षा दलाचे ६० अधिकारी होते. एअरबेस बांधण्यासाठी ही संख्या फारच कमीच होती. त्यांनी मग असा काही निर्णय घेतला की त्यासाठी त्यांचं आजही कौतुक होतं.

त्यांनी आसपासच्या गावातून तब्बल ३०० स्त्रियांना या कामासाठी विचारलं. महत्वाचं म्हणजे त्या सगळ्या स्त्रियांनी निर्भयपणे कामासाठी होकार दिला. विजय कर्णिक यांनी त्यांना हल्ल्याची पूर्ण कल्पना दिली होती. हल्ला झालाच तर जीव कसा वाचवायचा याबद्दल मार्गदर्शनही केलं होतं. सुदैवाने अशी कोणतीच घटना घडली नाही. सगळ्या स्त्रिया सुरक्षित राहिल्या. त्यांनी दिवसरात्र एक करून काम वेळेत पूर्ण केलं. या कामगिरीमुळे वायू सेनेचं विमान सुरक्षितपणे भूज येथे उतरवण्यात यश आलं.

(वीरांगना स्मारक, भुज)

मंडळी, १९७१ च्या युद्धातील भारताच्या विजयात या घटनेचा सिंहाचा वाटा आहे. याचं संपूर्ण श्रेय विजय कर्णिक आणि त्या ३०० जिगरबाज स्त्रियांना जातं. ही घटना आता मोठ्या पडद्यावर कशी दिसेल याची उत्सुकता आहे.

आज विजय कर्णिक हे निवृत्त आयुष्य जगत आहेत. त्यांच्या शौर्यावर चित्रपट तयार होतोय याचा त्यांना आनंद आहे.

 

तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required