दिनविशेष: १० जून याच दिवसापासून कामगारांना रविवारची सुटी मिळू लागली. वाचा- काय, कधी आणि कसं घडलं हे प्रकरण!!

मंडळी,  रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस असं आपण गृहीत धरतो. अर्थात याला काही अपवाद आहेत, पण सर्वसाधारणपणे रविवारच्या दिवशी कामं बंद ठेवली जातात. मंडळी, आज १० जून!! आजचा दिवस रविवारच्या सुट्टीसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण आजच्याच दिवशी इतिहासात कामगारांना रविवारची सुट्टी मंजूर करण्यात आली होती. राव, जी सुट्टी आपल्याला आज सहज मिळते,  तीच मिळवण्यासाठी त्याकाळी मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. त्याचीच ही गोष्ट.

स्रोत

तर अशी झाली सुरुवात !!

मंडळी, ही १८९० ची गोष्ट आहे. तेव्हा भारतात ब्रिटीश राजवट होती. १८७५ पासून भारतात मोठ्या प्रमाणात गिरण्या चालू झाल्या होत्या. सुरुवातीला गिरण्यांची संख्या ५४ होती. पुढे गिरण्यांची संख्या वाढत गेली. यात मुंबईचा देखील समावेश होता. जितक्या मोठ्या प्रमाणात गिरण्या निर्माण झाल्या, तितक्याच मोठ्या प्रमाणात कामगारांची संख्या वाढली. 
या गिरण्या कामगारांकडून अमानुषपणे काम करून घेत. कामगारांना ९ ते १० तास काम करावं लागे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण कामाच्या तासांमध्ये जेवणाची सुट्टी देखील नसायची. सलग सकाळी ५ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत काम करावं लागे.

(मुंबई मिल - स्रोत)

 मुंबईतील कामगारांमध्ये स्त्रिया आणि बालमजूरसुद्धा होते. स्त्रियांची संख्या २५,६८८ होती तर बालमजुरांची संख्या ६,४२४ होती. हातावर पोट असल्याने त्यांना कोणत्याही परिस्थतीत वेळेवर कामावर पोहोचण्याशिवाय पर्याय नसायचा. आजारी असणं म्हणे उपासमार हे ठरलेलं गणित होतं. शिवाय उशिरा आल्यावर पगार कापला जायचा.
अशा अमानुष काम करून घेण्याच्या पद्धतीला आळा घालण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडे यांनी पुढाकार घेतला. त्यांना हिंदुस्थानी कामगार चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखलं जातं. त्यांनी कामगारांची सभा घेऊन त्यांच्या वतीने आपल्या प्रमुख्य मागण्या तयार केल्या. 

या मागण्या पुढील प्रमाणे होत्या. (सुरुवातीच्या दोन मागण्या महत्वाच्या समजल्या जातात.)
१. कामाचे तास कमी करणे
२. आठवड्यातून एक सुट्टी
३. जेवणासाठी अर्ध्या तासाची सुट्टी
४. पगार वेळेवर व्हावा
५. कामगाराच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळावे. अपघात झाल्यास नुकसानभरपाई आणि रजेचा पगार मिळावा.

(नारायण मेघाजी लोखंडे -  स्रोत)

या मागण्या त्यांनी सरकारकडे पाठवल्या. सरकारने त्याकडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला. याला उत्तर म्हणून २४ एप्रिल रोजी हजारो कामगार रस्त्यावर उतरले. मोठा मोर्चा निघाला. शेवटी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांना यश आलं. १० जून १८९०पासून कामगारांना रविवारी सुट्टी मंजूर झाली. त्याबरोबर इतर सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. भारतीय इतिहासातला कामगारांचा हा सर्वात मोठा विजय म्हणून ओळखला जातो.

मंडळी, हे घडून येण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता, त्या नारायण मेघाजी लोखंडे यांनी पुढे ‘बाँबे मिल हँड्‌स असोसिएशन’ ही भारतातील पहिली गिरणी कामगार संघटना स्थापन केली. या संघटनेमार्फत कामगारांसाठी ते आयुष्यभर लढत राहिले.

तर मंडळी, रविवारच्या दिवशी जी सुट्टी आपण एन्जॉय करतो ती सहजासहजी मिळालेली नाही.

 

सबस्क्राईब करा

* indicates required