आयुर्वेद पावसाळ्यातल्या आहाराबद्दल काय म्हणतो?
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/field/image/ayurvedic-packages.jpg?itok=QycgJORK)
उन्हाळ्यात शरीरातला रस आणि स्नेह शोषला जातो. यामुळे जाठराग्नी मंद होऊन वातासारखे दोष वाढतात. या वाढलेल्या दोषांमुळे अग्नी अधिकच मंद होतो. अशावेळी प्रयत्नाने योग्य आहार-विहारांद्वारे अग्नीची शक्ती वाढवावी लागते.
त्यासाठी आयुर्वेदिक ग्रंथांनुसार काय कराल पावसाळ्यात –
-आहारामध्ये योग्य प्रमाणात मधाचा वापर करा.
-या काळात शरीरातला वायू खूप वाढत असल्याने आहारात आंबट, खारट आणि स्निग्ध पदार्थ घ्या.
-जेवणात जुनी धान्ये वापरा आणि चांगला रस्सा बनवून त्यासह योग्य मसाल्यांनी सुसंस्कृत केलेले मांस खा.
-या दिवसांत मध मिसळून मोहाचे किंवा औषधी मद्य प्या.
-पावसाळ्यात पाणी उकळून आणि गाळूनच प्या.
-कोरड्या आणि खरखरीत कापडाने अंग रगडून घ्या.
-कोरडे, सुगंधित आणि स्निग्ध औषधी चूर्ण अंगाला उटण्याप्रमाणे चोळून अंघोळ करा.
-सुवासिक फुलांच्या माळा वापरा.
-स्वच्छ, तलम कपडे घाला.
-ओलसरपणा किंवा दमटपणा नसलेल्या जागी निवास करा.
हे झाले काय करावे याबद्दल. याबरोबरच काय टाळावे याचेही मार्गदर्शन आपले ग्रंथ करतात –
-पावसाळ्यात दिवसा झोपू नका.
- शुद्धीकरणाची प्रक्रिया न करता पावसाळ्यात पाणी पिऊ नका.
-अति व्यायाम करणे टाळा.
-फार उन्हात बसू नका.
-अति स्त्रीसहवासाचा त्याग करा.
पावसाळ्यात, अशाप्रकारे वाढलेल्या दोषांचे शमन करणारा आणि अग्नी, म्हणजे पर्यायाने भूक वाढवणारा आहार-विहार करून आपली शक्ती टिकवून ठेवावी.