computer

दिनविशेष: विकास आमटेंच्या शिष्याने सांगितलेल्या विकासजींच्या आयुष्यातल्या काही हृद्य आठवणी..

आज विकास आमटेंचा वाढदिवस. खरंतर त्यांच्या कामाचा आवाका अफाट आहे.  विकास आमटेंसारख्या जेष्ठ समाजसेवक, विचारवंत, लेखकाचा चेहरा मनामनात पोहचायला हवा. म्हणून हा त्यांचे समाजिक क्षेत्रातील शिष्य किशोर मानव यांनी लिहिलेला छोटासा लेख आम्ही सादर करत आहोत. किशोर म्हणतात,"मी फक्त थोडक्यात त्यांना शब्दांत कैद करण्याचा प्रयत्न केला आहे."

२७ ऑक्टोबर १९४७ रोजी आदरणीय बाबा आमटे आणि माऊली साधना आमटे यांना पुत्रप्राप्ती झाली. एक अवलिया जन्माला आला. जहागीरदार आमटेंच्या नातवाचा जन्म वरोरामधे झाला. तेव्हा बाबा आणि साधनाताई खूपच हालाखीच्या परिस्थितीत होते. बाबांनी वकिली सोडली होती आणि वडिलांच्या संपत्तीवर पाणी सोडले होते. तेव्हा काम करत असलेल्या कोरगावकर यांच्या ट्रस्टकडून मिळनारे मानधन हेच त्यांचे कमाईचे साधन होते.  अशा परिस्थितीत विकासकाकांना कधी साधं बिस्कीट मिळालं नाही, की थंडीमध्ये स्वेटर पाहायला मिळालं नाही. थंडीत आईचं ब्लाऊज घालून ते झोपायचे. रोज जेवणात फक्त मुगाचे वरण त्यांना खावे लागत असे. बाबा आमटेंच्या पहिल्या कुष्ठरोग्याच्या पत्नीने तुरीच्या डाळीचा एक पदार्थ केला होता. तो विकास आणि प्रकाश यांनी चोरून खाल्ला होता हे पाह्यलं तर त्याकाळी विकासकाकांनी कशा परिस्थितीत दिवस काढले हे समजू शकते. दीड वर्षांच्या विकासला गोपाळ भटनागर नावाचे गृहस्थ स्मशानभूमीत घेऊन जात आणि ते लहान विकाससाठी कबरीवर बसून मस्त मस्त गाणी गात असत असं साधनाताई 'समिधा'मधे लिहतात. ही स्मशानभूमी त्यांच्या घरापासून इतकी जवळ होती की बरेचदा त्यांच्या घराच्या स्वयंपाकघरातून मृतदेह पुरला जाताना दिसत असे. तेव्हातर विंचूही आजूबाजूस सतत वावरत. विकासकाका अडीच वर्षांचे होते तेव्हा त्यांना विंचवाने दंश केला. त्यामुळे शरीर पूर्ण सुजले होते. त्यांनाच काय, बाबांना-ताईंना सर्वांनाच ते दिवस तसे काढावे लागले.
 

विकासकाकांशी मारलेल्या गप्पांमध्ये आमटे कुटुंबाबद्दल आजवर माहित नसलेल्या गोष्टी समजायच्या. यात कधी बाबांबद्दलच्या आठवणी असत, तर कधी काकांच्या लहानपणाबद्दलच्या. ते एकदा मला बोलले,"किशोर, लहानपणी आम्हाल कोणी मित्रच नव्हते रे. आम्हांला इतर मुलांप्रमाणे खेळ वगैरे खेळायलाही नाही मिळालं. आम्ही बाबांना म्हणायचो की बाबा आम्हांला दोस्त 'विकत' आणून द्या." 

साधनाताई सतत आजारी असत.  कधी टाइफाइड, तर कधी क्षयरोग. त्यातच घरी बरेचदा चोऱ्या होत असत. कुठली वस्तू चोरीला जात ते कळत नसे. एकदा ब्लँकेट चोरीला गेले होते.  मुलांचे झोपायचं खूप हाल झाले होते. साधनाताईंना मोकळा श्वास घेता यावा म्हणून बाबा जंगलाबाहेर पन्हाळगडावर वस्तीला आले तेव्हा विकासकाकांना ते पहिल्यांदा माणसात आल्याचं जाणवलं. आई आजारी असल्याने बाबा घरातली कामं करत. ते पाहून विकासकाका आणि प्रकाशकाकाही भांडी धुण्यासाठी चिमुकल्या हातांनी बाबांना मदत करत असत. आईवर त्यांचा फार जीव होता आणि आहे. सोमनाथमधे एक झाड साधनाताईंनी लावलं होतं.  ते अजून आहे. काका म्हणतात,"किशोर, मी बाबांबद्दल काही बोललो की आमची आई झाडाची पानं जोरात हलवून इशारा देते." आईला निसर्गउपचार म्हणून दूर राहावं लागलं तेव्हा, "विकास खूप मस्ती करतो, घरातली सर्वं कामं मी करतो असे ही म्हणतो. विकास कुणाचा विचारलं तर विकास विकासचा आहे म्हणतो" असे बाबा आदरणीय ताईंना पत्रातून कळवत असत. 

आनंदवन जंगलात निर्माण झाले होते. तिथं झाडेझुडपे, साप, इंगळी, रानडुक्कर हेच पाहायला मिळतं. शाळा म्हणाल, तर जिथे हमाल-मजुरांची मुलं शाळेत जात, तिथेच विकासकाकाही शिकले. त्यांचा शाळेत असतानाचा एक किस्सा आहे. गुरुजी "वर्गात पानतंबाखू खाऊ नये" असे सांगताच "तुम्ही खाता?" असे गुरुजींना विचारून विकासकाकांनी निरुत्तर केलं होतं. आज गंमतीत काका म्हणतात की, "गुटखा खाता तुम्ही लोक? खा तुम्ही, पण पाकीट आम्हांला द्या."  कारण त्या पाकिटांपासून सुंदर अशा गाद्या बनवल्या जातात.

१९६३-६४ मधे विकास आमटे मॅट्रिक पास झाले. मराठी-हिंदीत प्राविण्य मिळवून आणि फर्स्ट क्लास घेऊन!! बाबांचा संभाषणचातुर्य, भाषाप्रभुत्व, स्मरणशक्ती याचा वारसा विकास आमटेंनी घेतला आहे. विकास आमटेंना खरंतर इंजिनियर बनायचे होते, पण बाबांना कुष्ठरुग्णाची सेवा हेच आपले आयुष्य वाटत होते. आपली मुलं डॉक्टर होऊन त्यांची सेवा करतील असा विश्वास बाबांनी बोलून दाखवला नसला, तरी त्यांच्या ते मनात होतं. विकासकाका त्यामुळे डॉक्टर झाले,  पण आजही 'दिल से इंजिनियर' पेक्षा कमी नाहीत. त्यानंतर प्रॅक्टिस सुरु केल्यावर डॉक्टर म्हणून विकास आमटे फक्त दोनशे पन्नास रुपये मानधन घेत असत.  त्यामुळे एवढ्या पैशात संसार चालवणे आणि कुष्ठरुग्णांसोबत राहणारी मुलगी मिळणं कठीण होतं. म्हणून बाबांनी चक्क एका कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून वृत्तपत्रात जाहिरात दिली-"वधू पाहिजे'. पण काकांना अगदी शोभेल अशी वधू मिळाली. आणि त्या होत्या औरंगाबादच्या खासदार भाऊसाहेब वैशंपायन यांची कन्या भारती. आजही काका गंमतीत सांगतात," खासदारांची पोरगी आहे बरं..."

१९७०मध्ये बाबा आमटे सोमनाथला गेल्यापासून कुष्ठरुग्णांपासून आनंदवनातील पानाफुलांचीही काळजी घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे विकास आमटे होय. आनंदवनपासून थेट हेमलकशापर्यंत स्वतः ट्रक चालवित नेण्याचे धाडस त्यांनी कित्येकदा केले. ‘‘माझ्या विकासला कदाचित गावाचा तहसीलदारही ओळखत नसेल, मात्र त्याने केलेले काम आणि त्याचा आवाका माझ्याखेरीज कुणाला ओळखता येणार नाही’’, हे बाबा आमटेंचे वाक्य होते. ग्रामपंचायतीमध्ये एखादी संस्था कार्यरत असल्याचे आपल्याला माहिती असते. आनंदवन ही एकमेव अशी संस्था आहे, ज्याचे रूपांतर ग्रामपंचायतीत झाले आहे. 

कुष्ठरुग्णांच्या जखमा साफ करून आंघोळ न करता स्वच्छ साबणाने हात धुवून काका त्यांच्यासोबतच जेवायला बसत असे.  कारण ते त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होते. डॉक्टर नसूनही बाबांनी हे सर्व कसे हाताळलं याच आजही काकांना व मलाही नवलच वाटतं. विकासकाका डॉक्टर फक्त डिग्रीने होते. त्यांचे ह्रदय तर इंजिनियरचेच होते. त्यामुळे कुष्ठरोग्याचं अपंगत्व पाहिलं की त्यांना छोटी छोटी साधनं कशी तयार करून देता येईल याची काकांना चिंता लागत असे आणि मग काय, रबरी चप्पल व विविध वस्तू कल्पनेतून तयार होत असत. काकांच्या या विचारसरणीतूनच डॉ. भारती काकींच्या पुढाकाराने नवचैतन्य कृत्रिम अवयव निर्मिती केंद्र आनंदवनात सुरू झाले.

एका डॉक्टरऐवजी आता आनंदवनाला दोन डॉक्टर लाभले. भारतीकाकींनी उपचाराबरोबर तिथे योग शिक्षणही सुरू केले. शेकडो लोक याचा आनंद घेत आहेत. शीतल आमटे आणि कौस्तुभ आमटे अशी दोन मुलंही त्यांना आता साथ देत आहेत. विकास काकांवर आनंदवनचा पूर्ण भार बाबांनी सोपवला आणि ते.. त्यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर 'आनंदवनचे ठेकेदार' झाले. ते स्वतः ला ठेकेदार याकरता म्हणतात की आपण ठेकेदाराने केलेल्या कामात त्याच्या मालाच्या क्वालिटीबद्दल बोलतो, ठेकेदाराबद्दल नाही. म्हणून विकासकाका म्हणतात, " काम पाहा, मला नाही".  

आनंदवन शेतीमय झाले. त्यात अशोक बोलगुंडेवार, आनंदवनचे कृषिमंत्री नारायण ह्क्के, गजानन वसू यांची मोठी साथ काकांना लाभली आणि आनंदवनात आता हिरवळ पसरली आहे. आनंदवनातल्या लघुउद्योगामुळे इथले कुष्ठरुग्ण स्वावलंबी झाले आहेत. सुधाकर कडू, सदाशिव ताजने, दिलीप हेर्लेकर, गिरीधर राऊत, बंडू येनगंटीवार, नत्थू सोनेकर, मनीराम लंजे, सुमन कडू, रमेश अम्रू, शकुंतला, शेख गणी खान, मिस्त्री चंद्रमणी, गोविंदा खोड्पे या सर्वाना विकास काकांनी भरभरून प्रेम दिले. सोमनाथ प्रकल्प उभारणारे शंकरदादा जुमडे, हरी बढे, अरुण कदम आणखी बरीच नावं आहेत, ज्यांच्या सहकार्याने काकांनी आनंदवनचा कायापालट केला आहे. शेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार, घरबांधणी अशा अनेक क्षेत्रात विविध प्रयोग करून समाजाने नाकारलेल्या माणसांच्या कष्टातून उभारलं आहे "आनंदवन". अर्थात या आनंदवनाबद्दल जितकं लिहायला हवं होतं तितकं त्याच्याबद्दल लिहिलं नाही,  कारण ते ऊर्जेचं ठिकाण आहे.  ते वाचायचं नाही तर प्रत्यक्ष जाऊन अनुभवायचं ठिकाण आहे. 

आता विकासकाकांच्या गळ्याचं ऑपरेशन झाल आहे.  तरी ते बाबांविषयी, आनंदवन, कुष्ठरुग्ण यांच्याबद्दल भरभरून बोलतात. पण हो,  भारतीकाकी सोबत असल्या तर कमी बोलतात.  :-)  त्यांना ऐकणं म्हणजे बाबा आणि आनंदवनाबद्दल न ऐकलेल्या गोष्टी आपल्याला कळणं. कारण काकांची स्मरणशक्ती खूप ताकदीची आहे  आणि त्यांचं  वाचनही अफाट आहे. काकांना मी बऱ्याच वेळा "भारत जोडो.  पुन्हा गरज वाटत आहे" म्हणून बोललो आहे.  त्यांनी लवकरच करू असे या वर्षी जाहीर केलं आहे. 

काका, आज तुमच्या वाढदिवसाबद्दल हे चार शब्द प्रेमाने लिहावेसे वाटले. काही शब्द इकडेतिकडे झाले असतील तर माफी असावी..

किशोर (मानव)
जोडो भारत
9167759492

 

फोटो सौजन्य: शीतल आमटे आणि किशोर मानव