मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

संन्यास घेणाऱ्या मुलाच्या विरोधात आईवडिलांनी कोर्टात धाव का घेतली??

2 मिनिट वाचन
शेअर करा:
संन्यास घेणाऱ्या मुलाच्या विरोधात आईवडिलांनी कोर्टात धाव का घेतली??

(प्रातिनिधिक फोटो)

आपल्या मुलांनी खूप शिकावे, मोठे नाव कमवावे, चांगले पैसे कमावून श्रीमंत व्हावे असेच प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते. त्यासाठी ते करत असलेला त्याग पण मोठा असतो. आयुष्यभराची कमाई त्याच्या शिक्षणात गुंतवून म्हातारपणात आपला मुलगा आपल्याला सर्व सुखसोयी देईल अशी त्यांची अपेक्षा असते. आणि त्यात काही गैर नाही !! पण जर एखादा मुलगा आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करत नसेल तर? 

मंडळी, लग्नानंतर आई वडिलांना वाऱ्यावर सोडणारे तुम्ही आजवर अनेक बघितले असतील. पण लग्न न करता आई वडिलांना सोडणाऱ्या मुलाची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

गुजरातमधील धर्मेश गोल नावाच्या तरुणाने आपली फार्मसीमधील मास्टर्स पूर्ण करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्याने हा निर्णय घेतला तेव्हा तो एका एनजीओमध्ये 60 हजार रुपये पगारावर काम करत होता. त्याच्या अपंग आई वडिलांनी त्याच्या निर्णयाला विरोध केला. 'म्हातारपणात आम्हाला तुझी गरज आहे' अशी विनवणी त्यांनी केली, पण गड्याने ऐकले नाही. शेवटी त्याच्या आई वडिलांनी कोर्टात धाव घेतली.

आम्ही आजवर मुलाच्या शिक्षणावर 35 लाख खर्च केले. आता म्हातारपणात त्याने आम्हाला सांभाळावं एवढीच आमची ईच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी मुलाकडून दरमहा 50 हजार रुपये मिळावे अशी मागणी केली. कोर्टाने निर्णय देताना मुलाने दरमहा 10 हजार रुपये आई वडिलांना द्यावे असा निर्णय दिला. कोर्टाने सांगितले की एक मुलगा म्हणून त्या मुलाचे आपल्या आई वडिलांचा सांभाळ करणे हे कर्तव्य आहे. या जबाबदारी पासून तो कोणतंही कारण देऊन पळ काढू शकत नाही.

 

लेखक : वैभव पाटील.

संबंधित लेख