सध्याच्या लॉकडाऊन सारख्या परिस्थितीत आपण ज्या वस्तूंची प्रामुख्याने खरेदी करतो त्यात बिस्किटाचा समावेशही होतो. बिस्किट लवकर खराब होत नाही, दीर्घकाळ टिकतं. एका अहवालानुसार सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत बिस्किटांचा खपही वाढला आहे. हेच ओळखून पार्लेजी कंपनीने एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. पार्लेजी कंपनीकडून बिस्किटांची तब्बल तीन कोटी पाकिटं दान केली जाणार आहेत.

पार्लेजी कंपनीकडून एका आठवड्याला एक कोटी याप्रमाणे तीन आठवडे तीन कोटी बिस्किटांच्या पाकिटांच वाटप केलं जाणार आहे. ही बिस्किटं खासकरून गोरगरिबांमध्ये वाटली जातील. सध्याच्या आणीबाणीच्या काळात ज्यांना खायला अन्न मिळत नाहीत ते उपाशीपोटी झोपणार नाहीत याचीही काळजी पार्लेजी घेत आहे. पार्लेजी कंपनीने यासाठी सरकारी यंत्रणेसोबत हातमिळवणी केली आहे.
मंडळी, पार्लेजी कंपनीने आपले कामगार ५० टक्क्यांवर आणले आहेत. याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. ही एक समस्या तर दुसरी समस्या वाहतुकीची. वाहतुकीत येणाऱ्या अडचणींमुळे कच्चा मालाची आवक कमी झाली आहे. असं असूनही पार्लेजी कंपनीने आपलं उत्पादन कमी होणार नाही याची काळजी घेतली आहे.

पार्लेजी बिस्किट पाण्यात बुडवून खाल्ल्याचे किस्से तुम्हालाही माहित असतीलच. आज गोरगरीब जनतेवर तशीच परिस्थिती आली आहे. त्यांच्यासाठी पार्लेजीने दिलेला मदतीचा हात महत्त्वाचा ठरू शकतो. तुम्हाला काय वाटतं?






