निरोगी आयुष्यासाठी शरीराची स्वच्छता सर्वात महत्वाची मानली जाते. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच सर्वांना अंघोळीची सवय असते. शरीराची दुर्गंधी जातेच, तसेच शरीरावरील जीवजंतूही मरतात. गरम पाण्याने आंघोळ केल्याने ताजेतवाने वाटते. पण तुम्ही अनेकदा अनुभवले असेल की आंघोळीनंतर घाम येतो. टॉवेलने अंग स्वच्छ पुसल्यावर घाम येतो. थोडा घाम येणे स्वाभाविक आहे, पण या घामामुळे परत अस्वच्छ वाटते. हा घाम का येतो? आणि तो टाळण्यासाठी काय काळजी घेता येईल हे आपण समजून घेऊयात.
एका वैद्यकीय अहवालानुसार, आंघोळीनंतर येणारा घाम अतिरिक्त साठलेल्या उष्णतेमुळे येतो. म्हणजे आंघोळ झाल्यावर गरम पाणी आपल्या त्वचेला आणि केसांना चिकटून राहते. त्या थेंबामुळेच घाम येऊ लागतो. मग ते कोरडे करण्यासाठी तुम्ही टॉवेलने लगेच अंग पुसून काढता. त्यामळे पाणी पुसले जाते, पण टॉवेलच्या घर्षणाने त्वचा अधिक उष्णता निर्मात करते. तसेच बाथरूममध्ये गरम पाण्यामुळे आद्र्रता तयार होत असते, हे कारणही घाम येण्यास मदत करते. या आद्रतेचे उदाहरण म्हणजे आंघोळीनंतर बाथरूममधला आरसा पूर्णपणे धुरकट दिसतो. याचेही कारण अतिरिक्त वाढलेली उष्णता. बाहेर आल्यावरही घाम येत राहतो.

हा घाम टाळण्यासाठी काय करता येईल?
गरम पाण्याने आंघोळ झाल्यानंतर शरीर थंड होण्यासाठी थोडा वेळ द्या. लगेच पुसू नका. बाहेर पडण्यापूर्वी आणि कोरडे होण्यापूर्वी पाण्याचे तापमान कमी करा. एकदम गरम पाणी घेण्यापेक्षा शेवटची काही मिनटं कोमट पाणी अंगावर घ्यावे. कोमट किंवा थंड पाण्यात उभे राहिल्याने शरीराचे तापमान थंड होण्यास मदत होईल. तसेच बाथरुममध्ये एक्झॉस्ट फॅन असल्यास तो चालू ठेवणे त्यामुळे आद्र्रता तयार होणार नाही. वाफ तयार होणार नाही. दरवाजा किंवा खिडकी शक्य असल्यास थोडे उघडे ठेवल्याने वाफ बाहेर जाते आणि घाम कमी येतो.

बहुतेक वेळा खूप घाईत अंघोळ केली जाते. पण तज्ञांच्या म्हणण्यानुसार झोपेतून उठल्यावर लगेच किंवा खाऊन झाल्यावर किंवा व्यायाम झाल्यावर लगेच आंघोळ करणे टाळावे. आरोग्यासाठी अंघोळीच्या आधी अर्धातास शरीराचे तापमान सामान्य असावे.
ही माहिती आवडल्यास जरूर शेअर करा.
लेखिका: शीतल दरंदळे






