मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

रामी रेड्डी गेले पण स्पॉटनाना अमर आहे.

3 मिनिट वाचन
शेअर करा:
रामी रेड्डी गेले पण स्पॉटनाना अमर आहे.

९० च्या दशकात अनेक बॉलिवूड व्हिलन अजरामर झाले. अभिनेत्यांनी केलेली पात्रे त्यांच्या खऱ्या नावांपेक्षा जास्त प्रसिद्ध आहेत. कर्नल चिकारा म्हणजेच रामी रेड्डी हे पण असेच प्रसिद्ध व्हिलन!!! त्यांचा चेहरा बघूनच कोणी पण घाबरून जाईल असा हा भयंकर व्हिलन. डोळे, आवाज, एक्सप्रेशन प्रत्येक अंगाने फुल टू व्हिलन मटेरिअल असलेला हा अभिनेता, देशभर स्पॉटनाना या नावाने पण प्रसिध्द आहे.

देशात आजही एखादा टक्कल पडलेला मनुष्य जर तापट स्वभावाचा असेल तर त्याला स्पॉटनाना म्हणून बोलले जाते. इतके गारुड या स्पॉटनाना उर्फ रामी रेड्डी यांचे आहे. व्हिलन असूनही इतके प्रसिद्ध होणे सर्वांच्या नशिबी नसते. तरी देखील याच रामी रेड्डी यांचा शेवट मात्र वाईट झाला. २५० पेक्षा जास्त सिनेमे केलेल्या रामी रेड्डी यांना लिव्हरच्या आजारामुळे त्यांना सिनेमे सोडावे लागले होते.

रामी रेड्डी यांचा जन्म आंध्रातील चित्तुर जिल्ह्यातील वाल्मिकीपुरम गावात झाला होता. हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेऊन ते बाहेर पडले होते. सुरुवातीला तर रामी रेड्डी पत्रकार होते. हैदराबादचे प्रसिद्ध वृत्तपत्र मुंसिफ डेलीमध्ये त्यांनी बरेच दिवस काम केले. या काळात त्यांनी अंकुशम नावाच्या सिनेमात 'स्पॉटनाना'ची भूमिका साकारली आणि ही भूमिका हिट झाली.

पुढे त्यांनी थेट बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. व्हिलनच्या पात्रात ते ज्या पद्धतीने जीव ओतत ते बघता त्यांना इतर सिनेमे मिळायला वेळ लागला नाही. गोविंदा आणि संजय दत्त यांच्या सिनेमात त्यांनी बाबा नायक हा व्हिलन साकारला होता. या व्हिलन लोकांच्या अतिशय पसंतीस उतरला आणि बॉलिवूडमध्ये त्यांनी बस्तान बसवले.

वक्त हमारा है, ऐलान, दिलवाले, खुद्दार, अंगरक्षक, आंदोलन, हकीकत, अंगारा, रंगबाज, कालिया, लोहा, चांडाला, हत्यारा, गुंडा, दादा, जानवर, कुर्बानियां आणि क्रोध हे त्यांचे काही प्रमुख सिनेमे आहेत. बॉलिवूडबरोबर त्यांनी तमिळ, तेलगू, कन्नड, मलयालम, भोजपुरी सिनेमात पण काम केले आहे. यातील प्रत्येक पात्र आजच्या बदलेल्या जगात देखील लोकांना आवडते. 

पुढे त्यांना लिव्हरच्या आजाराने घेरले आणि हळूहळू ते सार्वजनिक जीवनातून बाजूला पडले. अतिशय तडफदार दिसणारा हा अभिनेता पूर्णपणे खंगुण गेला होता. एकदा एका कार्यक्रमात ते सहभागी झाले असता तो फोटो व्हायरल झाला असता कोणीही त्यांना ओळखू शकणार नाही अशी त्यांची अवस्था झाली होती. 

आधी लिव्हर मग किडनी आणि नंतरच्या टप्प्यात कॅन्सर यामुळेच त्यांचे जगणे कठीण होऊन बसले होते. सांगितले तर जाते की शेवटच्या काळात तर फक्त ते हाडांचा सांगाडा म्हणून उरले होते. कमालीचा प्रतिभेचा हा अभिनेता आपल्या अनेक भूमिकांनी जरी अमर झाला असला तरी १४ एप्रिल २०११ रोजी आपल्या आजारपणामुळे जगाला कायमचा सोडून निघून गेला.

रामी रेड्डी आजच्या मिम्सच्या जगात पण लोकांना भुरळ पाडत असतात. त्यांचे डोळे, डायलॉग यांच्या टेम्प्लेट असलेले मिम्स अधूनमधून व्हायरल होत असतात.

उदय पाटील

संबंधित लेख